रत्नागिरी : ‘भाषा व्याकरण शिकल्यामुळे येत नाही, तर ती अनौपचारिक मार्गानेच शिकता येते. संस्कृत ही सर्वव्यापी आणि ज्ञानपरंपरेची भाषा आहे,’ असे प्रतिपादन ‘संस्कृत भारती’चे शिरीष भेडसगावकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र नुकतेच सुरू झाले. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखा उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये व शिक्षक हिरालाल शर्मा उपस्थित होते.
‘राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून, संस्थानातर्फे भारतात सर्वत्र संस्कृत शिक्षण केंद्रे चालवली जातात. या सर्व केंद्रांना संस्कृतप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळतो. यासाठी वय व शिक्षणाची अट नसून, कोणतीही व्यक्ती यात प्रवेश घेऊ शकते. संस्थानाच्या वतीने हिमाचल प्रदेशहून आलेले शिक्षक हिरालाल शर्मा एक वर्ष मार्गदर्शन करणार आहेत,’ असे डॉ. कल्पना आठल्ये यांनी सांगितले.
डॉ. सुखटणकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि महाविद्यालयातर्फे व्यापक प्रमाणात उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. दीपक जोशी, सुनेत्रा जोशी दोन वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षणाचा लाभ घेत असून, त्यांनी अनुभवकथन केले. मुकुंद नायक यांनी या वेळी स्वरचित श्लोक म्हटले.
या केंद्रात दोन वर्षे अध्ययन करणाऱ्या अक्षया भागवत यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. स्नेहा शिवलकर व संस्कृतचे विद्यार्थी उपस्थित होते.